Skip to main content

शख्सियत

जितेंद्र अभिषेकी

अभिषेकी, जितेंद्र : (२१ सप्टेंबर १९२९ / १९३२ ॽ – ७ नोव्हेंबर १९९८). एक चतुरस्त्र गायक, संगीतकार व संगीतज्ञ. त्यांचे मूळ नाव गणेश व आडनाव नवाथे; पण मंगेशी देवस्थानातील पूजा व अभिषेक सांगणारे भिकाजी तथा बाळुबुवा यांचे पुत्र म्हणून आडनाव अभिषेकी झाले.

चतुर्दण्डिप्रकाशिका

सतराव्या शतकातील संगीतशास्त्रावरील एक प्रसिद्ध ग्रंथ. संगीतकार गोविंद दीक्षितांचा द्वितीय पुत्र पंडित व्यंकटमखी यांनी तो लिहिला असून ते उच्च कोटीचे गायक, वीणावादक, रचनाकार, शास्त्रकार, गणितज्ञ, तत्त्वज्ञ व राजनीतिज्ञ होते. कर्नाटकात ते व्यंकटश्वरी आणि व्यकंटेश्वर दीक्षित या नावांनीही परिचित होते. व्यंकटमखी तंजावरचे नायक राजा अच्युत विजयराघव (कार. १६६०–१६७३) यांच्या दरबारात होते. त्यांच्या प्रोत्साहनाने व्यकंटमखींनी चतुर्दण्डिप्रकाशिका  हा ग्रंथ लिहिला. त्यांनी स्थाय, आलाप, गीत व प्रबंध या चार स्तंभावर संगीताचे विश्व उभे केले, त्यावर या ग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे.

गायन समाज देवल क्लब

अभिजात हिंदुस्थानी संगीत, नृत्य व नाट्य यांचे प्रशिक्षण देणारी व सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करणारी कोल्हापूर (महाराष्ट्र) येथील विख्यात संगीतसंस्था. सुरुवातीस केवळ गाण्यावरील प्रेमापोटी विश्वनाथराव गोखले, त्र्यंबकराव दातार, गोविंदराव देवल, नातू फौजदार, भाऊसाहेब लिमये यांच्या पुढाकाराने १८८३ मध्ये  ‘करवीर गायन समाज’ या संस्थेची स्थापना झाली. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमधील दोन खोल्या मासिक वर्गणी चार आणे भाड्याने घेऊन या संस्थेचा प्रपंच सुरू झाला. केशवबुवा गोगटे, पखवाजी शिवरामबुवा शाळिग्राम, आप्पयाबुवा, बाळूबुवा गुळवणी, भाऊसाहेब कागवाडकर हे नियमितपणे येथे गान सेवा करीत.

केसरबाई केरकर

केरकर, केसरबाई : (१३ जुलै १८९२ – १६ सप्टेंबर १९७७). हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका. त्यांचा जन्म गोव्यातील केरी (तालुका फोंडा) या गावी गोमंतकातील संगीतपरंपरा असलेल्या कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. लहानपणी गावात होणाऱ्या गवळणकाला (श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारलेली मुलींनी केलेली नाटिका) उत्सवात त्या श्रीकृष्णाची भूमिका करत. त्यांची भूमिका पाहण्यासाठी व गायन ऐकण्यासाठी परगावांहूनही लोक येत असत. वयाच्या आठव्या वर्षी कोल्हापूर येथील वास्तव्यात त्यांनी किराणा घराण्याचे उ. अब्दुल करीमखाँ यांच्याकडे गायन शिकायला आरंभ केला.

किशोरी आमोणकर

आमोणकर, किशोरी : (१० एप्रिल १९३१ – ३ एप्रिल २०१७). हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या एक श्रेष्ठ व प्रतिभासंपन्न गायिका. त्यांच्या जन्म मुंबई येथे झाला. जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व माधवदास भाटिया यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. किशोरीताईंचे शालेय शिक्षण मुंबई येथील बालमोहन व प्रार्थना समाज या शाळांमध्ये झाले. त्यानंतर जयहिंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी घेतले.

उस्ताद अमीरखाँ

अमीरखाँ : (१५ ऑगस्ट १९१२ – १३ फेब्रुवारी १९७४). विसाव्या शतकातील ख्यातकीर्त भारतीय ख्यालगायक. उस्ताद अमीरखाँ हे इंदूर घराण्याचे प्रवर्तक म्हणून सुविख्यात आहेत. त्यांचा जन्म अकोला येथे झाला आणि त्यांचे पालनपोषण इंदूर येथे झाले. आजोबा छंगेखाँ व वडील शाहमीरखाँ यांच्याकडून संगीताचा वारसा त्यांना वंशपरंपरेने लाभला. त्यांचे पूर्वज हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील कलनौर येथील मूळ रहिवासी होते. आजोबा छंगेखाँ हे मोगल बादशाह बहादूरशहा जफर यांच्या दरबारात गायक होते, तर वडील शाहमीरखाँ हे इंदूर येथे होळकरांच्या दरबारात सारंगी व बीन वादक म्हणून काम करत.

होरी

उत्तर हिंदुस्थानी संगीतप्रकारातील एक शृंगार रसप्रधान गायन-प्रकार. याचा विषय प्रामुख्याने कृष्णाच्या रासलीला आणि राधा व गोपिकांच्या संगतीने रंगणारी होळी हा असतो. यातील वर्णन सहसा ब्रज भाषेतच असते. पूर्वी होरी धृपद गायक कलाकारच सादर करीत असत. धृपदाप्रमाणेच हा गायन प्रकार भारदस्त आणि बोजदार असे. हा गायनप्रकार धमार तालात गायला जाई, त्यामुळे धमार या प्रकाराला ‘पक्की होरी’ असेही म्हटले जाई. ख्याल गायनाप्रमाणे यात ताना घेतल्या जात नाहीत. बोलबनाव, दुगुण, तिगुन, गमक, बोलतान आदीने हा प्रकार खुलवत नेत असत. अलीकडे या गायनासाठी दीपचंदी तालदेखील उपयोगात आणला जाऊ लागला आहे.

स्वाती तिरूनल

स्वाती तिरूनल : (१६ एप्रिल १८१३ — २७ डिसेंबर १८४६). कुलशेखर वंशातील त्रावणकोर संस्थानचा एक कलाभिज्ञ, संगीतप्रेमी कर्तबगार राजा. पूर्ण नाव स्वाती तिरूनल रामवर्मा. त्यांचा जन्म राजा रामवर्मा कोईल थम्पुरण आणि महाराणी गौरी लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव रुमिणीबाई. त्यांचे धाकटे भाऊ उथरम तिरूनल मार्तंडवर्मा होत. तिरूनल दोन वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या मावशी गौरी पार्वतीबाई यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि राजपुत्रांचे संगोपन केले. तिरूनल यांचे वडील संस्कृत पंडित होते.

स्वरजति

स्वरजती सादरीकरणाची सुरुवात वर्णम् या शास्त्रोक्त गान प्रकाराने होते. वर्णम् म्हणजे ठराविक स्वरात बांधलेला छोटासा तुकडा. यासाठी मुख्यत्वे आदिताल किंवा अट्टताल या तालांची निवड करतात. वर्णम् मधील शब्द छोटे आणि सुटसुटीत असतात आणि ते काहीशा दीर्घ स्वराकृतीत असे बसविलेले असतात, की ज्यातून रागस्वरूप स्पष्ट व्हावे. वर्णम् नंतर पल्लवी आणि अनुपल्लवी सादर केली जाते. ‘पल्लवी’ रागाचे पूर्वांग स्थापित करते, तर ‘अनुपल्लवी’ उत्तरांग स्पष्ट करते. वर्णम् सादर केल्यानंतर रागसंगीताच्या रचनांमध्ये सर्वाधिक महत्त्व असलेली कृति आणि कीर्तन सादर केले जाते.

स्थायी/अस्ताई – अंतरा

हिंदुस्थानी अभिजात संगीत पद्धतीच्या गायनप्रकारांतील गीताचे (चीज) दोन भाग आहेत : पहिला अस्ताई (स्थायी), दुसरा अंतरा. पूर्वांगप्रधान रागात अस्ताईचा विस्तार व रागाचे स्वरूप साधारणत: मंद्र व मध्य सप्तकांतील स्वर घेऊन दाखवितात. अंतर्‍यामध्ये मध्य आणि तार या सप्तकांतले स्वर येतात. उत्तरांगप्रधान रागांच्या विस्तारात मात्र तारसप्तकातील स्वरही अस्ताईमध्ये (स्थायीमध्ये) येतात. अस्ताई-अंतरा मिळून गीतकल्पना पूर्ण होते. अस्ताई व अंतरा यांमध्ये पहिल्या समेपर्यंतचा भाग पुन:पुन्हा म्हटला जातो.

संबंधित राग परिचय